थांबलेल्या ट्रेनमध्ये गरमी होतेय म्हणून बाहेर ट्रॅकवर बसले प्रवासी, भरधाव राजधानी एक्सप्रेसने चिरडले
उत्तर प्रदेशच्या बलराई रेल्वे स्थानकाजवळ राजधानी एक्सप्रेसने अनेक प्रवाशांना चिरडले. ही घटना सोमवारी सकाळी घडली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बलराई रेल्वे स्थानकावर एक ट्रेन थांबली होती. गरमी होत असल्याने काही प्रवासी बाहेर उतरले आणि शेजारच्या रेल्वे ट्रॅकवर बसले. त्याचवेळी एक राजधानी एक्सप्रेस आली आणि प्रवाशांना चिरडून निघाली. या दुर्घटनेत 4 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तसेच 6 जण गंभीर जखमी झाले. त्या सर्वांना उपचारासाठी सैफई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुझफ्फरपूर येथून मुंबईच्या (वांद्रे) दिशेने जाणारी अवध एक्सप्रेस सोमवारी सकाळी 6 वाजता बलराई स्टेशनवर पोहोचली. या ठिकाणी राजधानी एक्सप्रेसच्या क्रॉसिंगसाठी अवध एक्सप्रेस थांबवण्यात आली. रेल्वेत गरम होत असल्याने काही प्रवासी बाहेर उतरले आणि शेजारील रेल्वे ट्रॅकवर जाऊन बसले. त्याचवेळी कानपूरहून दिल्लीला जाणारी भरधाव राजधानी एक्सप्रेस आली. प्रवाशी बसलेल्याच ट्रॅकवर जाणाऱ्या या राजधानी एक्सप्रेसने अनेकांना चिरडले आणि एकच गोंधळ उडाला. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये कौशंबी जिल्ह्यातील जीतू (20), पिंटू (21), सुरेंद्र कुमार (21), लालचंद्र (20) यांचा समावेश आहे. हे सगळेच कानपूर येथून रेल्वेत बसले होते तसेच आपसात एकमेकांचे नातेवाइक होते. या दुर्घटनेनंतर काही काळ रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली होती.