नवनवीन तंत्रज्ञानाद्वारे सामान्यांचे हित जोपासात जिल्ह्यातील विकास कामांना अधिक गती देणार -- पालकमंत्री राजेश टोपे
जिल्हाधिकारी कार्यालयात भूमापन दिन साजरा
जालना :- जगात विकसित होत असलेल्या नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून सामान्यांना मदत होऊन त्यांचे हित जोपासणाऱ्या उपक्रमांवर भर देत जिल्ह्यातील विकास कामांना अधिक गती देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले.
भूमापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते.
यावेळी उपविभागीय अधिकारी संदिपान सानप, जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख दादासाहेब घोडके, समीर दातेकर, सि.ए.सेवक, पी.व्ही.गामने, विलास राऊत, विक्रम बनछोड आदिची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले की, ग्रामीण भागात जमिनीचे अनेक वाद असतात. यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ड्रोनद्वारे भुमापानाचा उपक्रम सर्वसामान्यांना दिलासा देणारा आहे. या उपक्रमामुळे गावठाणातील प्रत्येक मिळकतीचा नकाशा व मिळकत पत्रिका तयार होऊन जमीनीचे होत असलेले वाद यामुळे कमी होणार आहेत. ग्रामपंचायतीकडील मालमत्तापत्रक अद्यावत झाल्यामुळे महसूलात वाढ़ होण्याबरोबरच शासनाच्या, ग्रामपंचायतीच्या खुल्या जागेवरील अतिक्रमण रोखता येणार असल्याचेही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले.
सर्वसामान्यांना मदत होऊन त्यांचे हित जोपासले जावे या बाबीवर भर देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून या उपक्रमासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून नविन्यपूर्ण योजनेतून विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे. जालना जिल्ह्यातील तीन तालुक्यामधील ड्रोनद्वारे गावठाण मोजणीचे काम अचूकपणे पूर्ण करण्यात आले असून उर्वरित पाच तालुक्यातील कामेही गतीने पूर्ण करण्यात यावीत. महसूल विभागाने अत्यंत सतर्कपणे सर्वसामान्यांची कामे विनाताक्रार वेळेत पूर्ण करण्याच्या सूचनाही पालकमंत्री श्री. टोपे यांनी दिल्या.
यावेळी जालना,बदनापूर आणि अंबड तालूक्यातील नागरिकांना डिजिटल नकाशे व सनदीचे प्रतिनिधिक स्वरूपात पालकमंत्री श्री. टोपे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. कार्यक्रमास महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.